गेल्या आठवड्यात शेअर बाजारात काही विशेष घडामोडी नव्हत्या. आर्थिक सुधारणा केव्हाच थांबल्या आहेत. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण चालूच आहे. तो आता ७१ रुपयांची सीमा ओलांडून गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलचे भाव बॅरलला १०० डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. पेट्रोल आणि रुपयाने शंभरी गाठली, तर अर्थव्यवस्थेची शंभरीही भरण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी सावधपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्याबद्दल पाहू या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ....
............
‘अच्छे दिन’ आता ‘बुरे दिन’ झाल्यात जमा आहेत; पण राज्यकर्ते ‘धृतराष्ट्र’ झाले आहेत. याचा परिणाम शेअर बाजारावर होणे स्वाभाविक आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात काही विशेष घडामोडी नव्हत्या. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३८ हजार ३८९वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११ हजार ५८९ वर बंद झाला.
दिवाण हाउसिंग फायनान्स, येस बँक असे अनेक शेअर्स उतरले आहेत. येस बँक शेअर सध्याच्या भावात विकत घेतला, तर डिसेंबरपर्यंत त्यात २० टक्क्यांची वाढ दिसावी. बँकेचे प्रमुख राणा कपूर यांची सशर्त पुनर्नियुक्ती रिझर्व्ह बँकेने केली आहे; पण कालावधी निश्चित केलेला नाही. त्यामुळे या शेअरमध्ये घसरण झाली. बँकेची अनार्जित कर्जे कमी आहेत. भांडवल पर्याप्तता पुरेशी आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १७.९ पट आहे. रोज पावणेपाच कोटी शेअर्सचा व्यवहार होत आहे.
रुपया घसरत चालल्याने संगणन क्षेत्र आणि अमेरिकेत विक्री असलेल्या अरविंदो फार्मासारख्या औषधी क्षेत्रातील कंपन्या यांना चांगले दिवस आहेत. इन्फोसिस, टीसीएस, पर्सिस्टंट सिस्टीम्स, माइंड ट्री यांचे शेअर्स माफक प्रमाणात घेतले, तर थोडाफार फायदाच होईल. शेअर बाजारात तेजी टिकण्यासाठी चांगले वातावरण नाही. त्यामुळे आहे तेच भागभांडवल टिकवून ठेवणे इष्ट ठरेल. राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात सर्वत्र अनिश्चतता आहे. तेलंगण राज्याची विधानसभा मुख्यमंत्री राव यांनी राजीनामा देऊन विसर्जित केल्याने तिथे आता नव्याने कधी निवडणुका घेतल्या जाव्यात, हा चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला गेला आहे. पुढील काळात राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम या राज्यांतही निवडणुका अपेक्षित आहेत. त्यांच्याबरोबरच तेलंगणचेही वेळापत्रक ठरावे. जागतिक बाजारात सध्या सर्व खनिजांचे भाव वाढत आहेत. अॅल्युमिनियम, तांबे, शिसे, पोलाद, ग्राफाइट, मँगनीज या धातूंच्या कंपन्यांना त्यामुळे चांगला फायदा व्हावा. हिंदाल्को, नाल्को, मॉइल, रत्नमणी मेटल्स वगैरे कंपन्यांचा अभ्यास करून गुंतवणूक केल्यास हितावह ठरेल.
सध्याचे वातावरण धाडस दाखवण्यासाठी पोषक नाही. ग्राफाइट इंडिया, हेग या दोन्ही कंपन्यांमध्ये अजूनही गुंतवणूक करावी. ग्राफाइट इंडियाचा शेअर सध्या ११०० रुपयांवरून पुन्हा ९८० रुपयांपर्यंत आणि हेगचा शेअर ४१०० रुपयांपर्यंत आला आहे. त्यात सध्याच्या भावाला गुंतवणूक केली, तरी वर्षभरात ३५ टक्के फायदा व्हावा; तसेच ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कंपनी, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांतही मार्च २०१९पर्यंत गुंतवणूक हवी. राजकीय अस्थिरता मात्र ध्यानात घ्यावी.
डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)
(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)